वाळूज महानगर (ता.26) – बहिणीच्या अपहरणावरून जाब विचारल्याने फोनवरच उडालेल्या खटक्यातमुळे आरोपीने संगणमत करून घरी येत गावठी कट्ट्यातून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. मंगळवारी (ता.25) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उडालेल्या या थरारात एक जण जखमी झाला. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्जुन राजू काळे वय 22 वर्षे, रा. रांजणगाव (शेणपुजी) सावता माळी मंदिराजवळ ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर याची चुलत बहिणी दिपाली अनिल काळे हीचे श्रावण सुरेश पिंपळे रा. नायतळा ता. निफाड जि. नाशिक याने अपहरण केल्याने त्यांच्यात फोनवरून खटके उडाले. त्यावरून श्रावण पिंपळे व अन्य एका अनोळखीने अचानक घरी येऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. यावेळी काळे यांनी शटर बंद केले, तरीही ही गोळी शटर मधून घुसून काळे याच्या गुडघ्याला लागली.
मंगळवारी (ता.25) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उडालेल्या या थरारात तो जखमी झाला. याप्रकरणी अर्जुन राजू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्रावण सुरेश पिंपळे व अन्य एका विरुद्ध कलम 307, 34 भादंवि सह कलम 3, 25 शस्त्र अधिनियम प्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना –
पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधार्थ पथक रवाने झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पागोट करीत आहे.
गृहमंत्री दखल घेईल का –
वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला काही भ्रष्ट पोलीस अधिकारी जबाबदार असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी पुराव्यानिशी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र खरोखरच गृहमंत्री वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेईल का. व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
