वाळूजमहानगर, ता.29 – पत्नी बाहेरगावी तर पती कंपनीत गेल्यानंतर बंद असलेल्या घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी जवळजवळ 16 तोळे सोन्याच्या दागदागिन्यासह साडेचार लाखाचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना सिडको वाळूज महानगर -1 येथे बुधवारी (ता.27) रोजी भरदिवसा घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील इंडोरन्स कंपनीचे व्यवस्थापक राजु बाबुराव बनकर हे कुटुंबासह सिडको वाळूजमहानगर -1 येथील समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहतात. राजुु बनकर यांची पत्नी ज्ञानश्वरी ही मुलाला भेटण्यासाठी मंगळवारी (ता.26) रोजी बडोदरा (गुजराज) येथे गेली होती. त्यामुळे राजु बनकर हे घरी एकटेच होते. बनकर हे
27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे घराला कुलूूप लावून कंपनीत गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधून त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कपाटात ठेवलेले 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 6 तोळ्याचे दोन मनी मंगळसुत्र, 99 हजार रुपये किमतीचे 33 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या चैन, 30 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 7 कॉइन, 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 25 ग्रॅमचे 4 झुमके, 18 हजार रुपये किमतीची 6 ग्रॅमची एक जोड इयररिंग
असा एकून 4 लाख 47 हजार रुपये किमतीचे जवळजवळ 16 तोळ्याचे सोन्याचे दागदागिने घेऊन पोबारा केला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राजू बनकर हे घरी आले असता चोरीची ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करीत आहे.
नागरिकांमध्ये खळबळ –
सिडको वाळूज महानगरातील अनेक जण नोकरी व काम धंद्या निमित्त बाहेर असतात. त्यामुळे अनेकांची घरे दिवसा बंद असतात. बनकर कुटुंबाच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (ता.27) रोजी घरफोडी करून लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सिडको वाळूज महानगर येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी गस्त घालावी –
सिडको वाळूज महानगर -1 व 2 हा परिसर उच्चभ्रू मानला जातो. चोरट्यांचा येथे मोठ्या प्रमाणात वावर असतो. कोणाचे घर कधी बंद असते, घरात कोण कोण असते. अशी टेहाळणी करून अज्ञात चोरटे डाव साधतात. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त घालावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.