
वाळूजमहानगर, (ता.4) – आदर्श ग्राम पाटोदा येथील सह्याद्री स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा सोमवारी (ता.3) रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन, कविता सादरीकरण, भाषण यांच्या माध्यमातून गुरूचे महत्त्व सांगितले. यामध्ये पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला शुभेच्छा पत्र देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण, निसर्ग, पशु, पक्षी, पुस्तके, संगणक, शाळा, शिक्षण या सर्व सजीव-निर्जीव गुरूविषयी प्रत्येकाने कृतज्ञ असावे असा संदेश दिला व विद्यार्थ्यांनी गुरु विषयी आदर दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कठोर परिश्रम घेऊन यश मिळवण्याची ही प्रतिज्ञा घेतली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसन्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक निलेश म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व पटवून मोलाचे मार्गदर्शन केले. आठवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर कविता सादर केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरु आणि शिष्याचे अतूट आणि भावनिक नाते नाट्यरूपातून सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेवी आघाव, सृष्टी दवंगे, आदित्य रेबारी या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून गुरूंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तर हर्षदा पानवडे हिने आभार मानले. कार्यक्रमाची सांगता ‘गुरुस्तुती’ने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता भराडे, देबारती घोष, अभिषेक गौंड, प्रियंका गायकवाड, शिल्पा पोफळी, पुनम पाठक, रत्नप्रभा पाटील, ज्योती साळवे, शितल महाले, सुप्रिया गणगे, आरती यादव, रुचिका मेहेत्रे, आरती खंडागळे, जया पगारे व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
