वाळूजमहानगर, (ता.15) – विश्व फाऊंडेशन शिवपुरी, अक्कलकोट गुरुमंदिर बाळप्पा मठ आणि जागृत हनुमान मंदिर, बजाजनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.11) रोजी सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम घेण्यात आला. यात जवळजवळ 1 हजार महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला. यात 500 जणांना अग्निहोत्राची आहुती देण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी करण्यासाठी विश्व फाउंडेशन शिवपुरी, अक्कलकोटचे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते अनेक दिवसापासून बजाजनगर परिसरात प्रचार करत होते. दरम्यान वीस ते पंचवीस हजार लोकांपर्यंत या अग्नीगोत्र कार्यक्रमाचा संदेश गेला.वेदांचा मुलभूत धर्म, वेदांची मूलभूत उपासना, वेदांनी सांगितलेले मानवांचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितला गेलेला पंचसाधारण मार्ग म्हणजेच यज्ञ, ज्ञान, तप, कर्म आणि स्वाध्याय. याचा पुरस्कार अक्कलकोट निवासी परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी केला. 
सध्याच्या काळात यज्ञाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपल्या सभोवतालचे वातावरण हे अत्यंत दूषित झालेले आहे. आणि यज्ञाद्वारे वातावरणावर व निर्सगावर खूप चांगले परिणाम होतात. वातावरण व निसर्ग शुद्ध करता येतो. ज्याचा परिणाम मानवी मनावर, शरीरावर त्याच बरोबर या वातावरणामध्ये राहणाऱ्या प्रत्येक पेशींवरती होतो. अशी अग्निहोत्र ची संकल्पना आहे.
https://youtu.be/mN-LopiF_wk?si=qgjH7UcGe477t5tU
या कार्यक्रमास बजाजनगर परिसरातील शेकडो महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला. जागृत हनुमान मंदिराचे विश्वस्त, कार्यकारी मंडळ यांनी देखील या यज्ञात भरभरून सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व फाऊंडेशन शिवपूरी अक्कलकोट यांनी परिश्रम घेतले.

