
वाळूजमहानगर, (ता.27) – विद्यार्थ्यांच्या अंगी शालेय जीवनापासूनच देशभक्ती आणि देशसेवा रुजवणे काळाची गरज आहे. आणि देशहितासाठी त्याग करणे हीच खरी देशसेवा. असे मत माजी कॅप्टन अरविंद गायकवाड यांनी
व्यक्त केले. तसेच भगतसिंह विद्यालय ही शाळा माजी सैनिक नानासाहेबांकडे असल्याकारणाने या शाळेतील विद्यार्थी नक्कीच देशभक्त आणि देश सेवक घडतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील शहीद भगतसिंग विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात गुरुवारी (ता.26) रोजी कॅप्टन गायकवाड हे बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य दीपक वडे, अक्षय हरकळ, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रीती सपकाळ, रंजना जाधव, पूजा शिरसाट, शबाना शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रथम अरविंद गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शाळेतील 7 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी कवायत, झांज प्रात्यक्षिक, शारीरिक कसरतींचे प्रात्यक्षिक, मनोरे, देशभक्तीपर गीते तसेच नृत्य, समाज प्रबोधन पर नाटिका, 1 ली ते 6 वीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. शाळेच्या प्रभात फेरीतील सजीव देखाव्यांनी न्यू शहीद भगतसिंह विद्यालय ते ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव (शेणपुंजी) पर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदिनाथ आडसरे, सूत्रसंचालन बाळू खोपडे यांनी तर आभार करण लघाने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
