
वाळूजमहानगर, (ता.21) – वाळूजमहानगर, ता.21 (बातमीदार) नर्मदा परिक्रमास पायी गेलेल्या 60 वर्षीय भाविकाचा अती थकव्याने रस्त्यात प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान रस्त्यातच बुधवारी (ता.18) जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

राहेगाव ता. वैजापूर येथील उत्तम शंकरराव पाटील तुपे (वय 60) असे या भाविकांचे नाव आहे. तालुक्यातील इतर भाविक व नातेवाईकांसह तुपे हे 11 नोव्हेंबर 2022 रोजी नर्मदा परिक्रमाच्या यात्रेसाठी गेले होते. त्यांनी सलग 67 दिवस पायी प्रवास केल्याने थकवा आला होता. त्यामुळे रस्त्यातच प्रकृती बिघडल्याने त्यांनी मध्यप्रदेशातील मांडला येथे उपचार घेतला. परंतु त्यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. सोबतच्या भाविकांनी फोन केल्याने नातेवाईक त्यांना घ्यायला गेले होते. ते परत येत असताना सिंदखेड राजा येथे जिजाऊ हॉस्पिटल येथे आयसीयु मध्ये दाखल करण्यात आले. परंतु तुपे यांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे डॉक्टरांनी औरंगाबादयेथे रुग्णाला हलवण्याचं सांगितले. त्यामुळे रुग्णवाहिकेतून औरंगाबाद कडे येत असताना शिंदखेडा राजाजवळ रस्त्यातच बुधवारी (ता.18) रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
