
वाळुज महानगर -सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक चळवळ आणि लेखणीच्या माध्यमातून स्त्रियांविषयी तसेच तत्कालीन समाजाविषयीच्या चित्रीत करणाचा प्रयत्न केला. स्वतंत्र लेखिका म्हणून त्यांनी आपले अस्तित्व तयार केलं. सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिका, लेखिका आणि कवियत्री सुद्धा होत्या. असे मार्गदर्शन तर प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे यांनी केले.

बजाजनगरातील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी 3 जानेवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य या विषयावर प्राचार्य डॉ. राहुल हजारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हजारे पुढे म्हणाले की, काव्यफुले हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांच्या अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. या काव्यसंग्रहात निसर्ग, प्रबोधन, सामाजिक आणि आत्मपर कवितांची रचना त्यांनी केली, तसेच स्त्री ही फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरती मर्यादित न राहता तिने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावे व पुरुषांच्या बरोबरीने काम करावे, सन्मान मिळवावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. शिक्षण हे उद्धाराचे माध्यम आहे हे जाणून त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली व स्वतः मुख्याध्यापिका बनवून शिकवण्याचे काम केले. शिकलेल्या व्यक्तीला तिच्या कर्तुत्वाची, हक्काची आणि अधिकाराची जाणीव होते हे त्यांनी जाणले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनुजा कंदी यांनी केले तर आभार डॉ रमेश जायभाये यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ सिंधू हळदे व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
