
वाळुज महानगर, (ता. 23) – विटावा येथील जनजागृती महिला ग्राम संघाची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.22) रोजी झाली. यामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने महिलांनी केलेल्या महिला ग्राम संघाची सर्वसाधारण सभेमध्ये विविध व्यवसाय करून आत्मनिर्भर होण्याच्या संकल्प केला.

यावेळी आत्मा अभियानाचे दिलीप मोठे यांनी महिलांना सेंद्रिय शेतीचे महत्व समजावून सांगितले. तसेच तालुका व्यवस्थापक अनिल कांबळे यांनी बँक कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन केले. कृष्णा साळवे यांनी लखपती दीदीविषयी माहिती दिली. विलास झाल्टे यांनी ग्राम संघाचे महत्व व अनुषंगिक कामाविषयी माहिती दिली. तसेच ग्रामप्रशासक भारत घुगे यांनी महिलांना छोटे, मोठे उद्योग व्यवसाय करण्याविषयीचे मार्गदर्शन केले. 
ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी ग्राम संघाचे ग्रामपंचायती अंतर्गत महत्व व महिलांच्या एकजुटीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच कैलास शिनगारे, उप सरपंच आणा गांगार्डे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग माळी यांची उपस्थिती होती. सचिन आंबोरे प्रभाग समन्वयक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आयसीआरपी शांता दूधमल, उपजीविका सखी डोहाळे ताई, ग्राम संघाच्या पदाधिकारी सुषमा गायकवाड, सुवर्णा पांचाळ, मंदा पिठले यांच्यासह समूहातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
