
वाळुज महानगर, (ता.14) – धामोरी तालुका गंगापूर येथे कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम अंतर्गत नैसर्गिक शेती गटातील शेतकऱ्यांसाठी प्रबोधन कार्यक्रम बुधवारी (दि.14) रोजी घेण्यात आला.

यावेळी कृषी सहाय्यक अशोक म्हस्के त्यांच्यासह कृषी सखी आणि गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी तालुक्यात 1000 एकर क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच यासाठी नदीकाठी वसलेली गावे, खताचा जास्त वापर करणारी गावे मार्गदर्शक सूचनेनुसार निवडण्यात आल्याचे सांगितले.
जागतिकीकरणामुळे मानवी आयुष्यावर होत असलेल्या बदलामुळे शेती आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत असून गाव पातळीवर कृषी सखीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच निवेष्ठा निर्मिती केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक खताबाबत प्रशिक्षण आणि पुरवठा करण्याचे नियोजित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास गणेश शेळके, राजू शेळके उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी ही योजना प्रभावीपणे राबवून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा यासाठी आत्माच्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, प्रकल्प उपसंचालक डॉ. अभयकुमार पडीले, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय, मंडळ कृषी अधिकारी गोसावी यांच्यासोबत कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच आत्मा यंत्रणा गंगापूर हे परिश्रम घेत आहेत.
