
वाळुजमहानगर, (ता.9) – स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीविताची व वाहनांची काळजी न घेता अत्यंत धोकादायकरित्या वाहन चालवत नेल्याचा प्रकार बुधवारी (ता.9) रोजी सकाळी वाळुज महामार्गावर पहावयास मिळाला.हे दृश्य पाहून अनेकांच्या तोंडातून आपोआपच ‘अबब… केवढी ही रिस्क’. असे शब्द पुटपुटले.
रस्ता असो की महामार्ग, एक्सप्रेस वे असो की राज्यमार्ग. वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असते. यामध्ये लहान मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा समावेश असतो. वाहन चालवताना जो तो आपले ध्येय साधण्याच्या घाईगडबडीत असतो. अशावेळी वाहनचालक आपल्या जीविताच्या सुरक्षिततेची, रस्त्यावरील अन्य वाहनधारकांच्या जीविताची किंवा स्वतःच्या वाहनांच्या सुरक्षिततेची काळजी बाळगत नाही. असाच एक प्रकार बुधवारी (ता.9) रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील वाळूज ते पंढरपूर दरम्यान पहावयास मिळाला. त्यात ट्रक (एम एच 17, बी डी -9293) चा चालक अपघातात कारणीभूत ठरेल असे अत्यंत धोकादायकरित्या वाहन चालवत होता.
अपघाताच्या प्रमाणात वाढ –
आपल्या ताब्यातील वाहनाची आणि त्यातील सामानाची काळजी न घेता धोका पत्करून अनेक चालक वाहन चालवतात. त्यामुळेच दररोज अपघाताच्या बातम्या धडाधड येतात. प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्यास अनेक अपघाताला आळा बसेल. आणि विशेष म्हणजे पोलिस आणि आरटीओचा ताण कमी होइल.यात काहीच शंका नाही.
