वाळुज महानगर (ता.10) – गंगापूर खुलताबाद मतदारसंघात शेती, सिंचन, पर्यटन आदी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडवा. असे आवाहन खा.शरद पवार यांनी रविवारी (ता.10) रोजी गंगापूर येथे जाहीर सभेत केले.
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा.शरद पवार यांची गंगापूर शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. शेतमालाला भाव नाही. कवडीमोल भावाने शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. आम्ही 71 हजार कोटीची कर्जमाफी केली. ही संवेदनशीलता मोदी सरकारकडे नाही. पाच महिन्यांत 900 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.त्यामुळे भाजपच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे. असे आवाहन शरद पवार यांनी जनतेला केले.
गंगापूर-खुलताबाद मतदारसंघील एकही प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाचा आमदार सोडू शकला नाही. गोदावरी जवळ असून शेतीसाठी व पिण्यासाठी या तालुक्यात पाणी आले नाही, खोटी आश्वासने दिली जातात व फसवणुकीचे उद्योग करुन लोकांची मते मिळवली जातात. हे इथे वारंवार घडत आले आहे. अशा शब्दांत शरद पवार यांनी विद्यमान आमदार यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता या तालुक्याचा विकास करायचा असेल तर तुम्हाला परिवर्तन करावे लागेल. सतीश चव्हाण यांच्या मागे या निवडणुकीत उभे राहावे लागेल. असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
प्रारंभी उमेदवार आ.सतीश चव्हाण यांनी सभेत विजयी करण्याचे आवाहन करून विद्यमान आमदार यांना या तालुक्याचे प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश यावर भाष्य केले. या मतदारसंघातील पाणी, सिंचन, शिक्षण, आरोग्य व अनेक सार्वजनिक प्रश्न जैसे थे आहेतच. उलट प्रश्न विचारणाऱ्या तरुणांवर दडपशाही करीत आहे. ही दादागिरी संपुष्टात आणावी लागेल व तालुक्यात लोकांच्या हिताचे व विकासाचे राजकारण करावे लागेल. यासाठी साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक दिलाने काम करुन हा व्यापारी माणूस घरी बसवला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत वाईट वागणाऱ्या भाजपला धडा शिकवावाच लागेल. असे आवाहन केले. भूषणसिंह राजे होळकर यांनी देखील आमदार सतीश चव्हाण यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.
माजी मंत्री फौजिया खान, मा.खा.चंद्रकांत खैरे, भूषणसिंह राजे होळकर, किशोर पाटील, सुधाकर सोनवणे, डॉ.नरेंद्र काळे, आबेद जागीरदार, हाजी अकबर बेग, दिलीप बढकर, संजय जाधव, जगन्नाथ खोसरे, पांडुरंग तांगडे, मोहसीन चाऊस, रावसाहेब तोगे, अंकुश काळवणे, विश्वजीत चव्हाण, लक्ष्मण सांगळे, सुवर्णा जाधव, अशोक गायकवाड, श्याम बनसोड, लक्ष्मण सांगळे, संपत छाजेड, दिनेश मुथा, आप्पासाहेब गावंडे, गजानन फुलारे, अनिल चव्हाण, अशोक खोसरे, राजू वरकड, किशोर कुकलारे, शोभा खोसरे, छाया जंगले, अप्पासाहेब गावंडे, रमेश निचित, नईम मन्सूरी, मच्छिंद्र देवकर, सुभाष वरकड, नासेर पटेल, आयुब पटेल, सुनील धाडगे, अनिता खोसरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप बनकर यांचा प्रवेश –
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बढकर, मारुती साळवे, मुजीब समाज आदींनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.