वाळुज महानगर, (ता.15)- उपोषण करून सुद्धा आरक्षण मिळत नाही. तसेच घेतलेल्या कर्जासाठी सुरू असलेला बँकेतून तगादा. यामुळे नैराश्य आलेल्या एका 22 वर्षीय मराठा तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. ही घटना (ता.15) मे रोजी सकाळी वडगाव (को.) येथे उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दत्ता कालिदास महिपाल पाटील (वय अंदाजे 22) रा. शिंदेवाडी ता. माजलगाव जि. बिड हा बारावी शिकलेला शेतकरी तरुण व त्याचा सहकारी कृष्णा पवार असे दोघे वडगाव (को.) परिसरात भाड्याने एका रूममध्ये राहत. हे दोघेही खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. मंगळवारी पवार हा रात्र पाळीला गेला होता. तर दत्ता हा रात्री घरीच होता.
कर्ज व मराठा आरक्षण –
दरम्यान दत्ताने एका चिठ्ठामध्ये बँकेकडून घेतलेले कर्ज भरता न आल्याने बँकेतून फोन येत आहे व दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी स्वतः उपोषण करून सुद्धा आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मचकूर लिहून रात्री भाऊ महेश महिपाल याला व्हॉट्सअप केला. आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
चिठ्ठीत लिहलेला मचकूर-
काही कारणास्तव फाशी घेत आहे, गोपाळा अर्बन माजलगाव या बँकेतून मी 1 लाख रुपये घेतले होते, पण काही कारणानुसार काही हप्ते भरले नाही. रोज फोन येत होते. त्यामुळे मला खूप त्रास झाला. मोठे बिजनेस वाले कर्ज घेतात. व न भरता पळून जातात. विजय माल्या असेल किंवा निरव मोदी असेल. त्यांना कोणी काही बोलत नाही. पण शेतकऱ्यांनाच सर्व बोलतात. दुसरं कारण मराठा आरक्षण मिळत नाही कारण काय आहे. मी उपोषण करून काय फायदा झाला नाही.सरकार त्याची भरपाई करावी. सॉरी मम्मी पप्पा सुखी रहा.तुमचा दत्ता असा मचकूर त्या चिठ्ठीत लिहिला आहे.
तर वाचला असता दत्ताचा जीव –
दत्ता ने रात्री चिठ्ठी लिहून भाऊ महेशला पाठवली, तो मेसेज महेश याने सकाळी पाहिला. आणि त्याला धक्का बसला. तो महेश ने रात्रीच पाहिला असतात तर दत्ताचा जीव वाचवता आला असता.
शेतकऱ्यांनाच त्रास –
मोठे बिजनेस वाले कर्ज घेतात आणि न फेडता पळून जातात. त्यात निरव मोदी असेल किंवा विजय माल्या. त्यांना कोणीही काहीही करत नाही. मात्र शेतकऱ्यांनी कर्ज घेतले तर वसुलीसाठी त्यांना त्रास देण्यात येतो. असेही दत्ता महिपाल पाटील यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद आहे.

