
वाळूजमहानगर, (ता.4)) – सिडको वाळूज महानगर येथील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा वाढवून देण्यात यावा. तसेच दैनंदिन पाणी पुरवठ्यात सुधारणा व सुसूत्रता आणण्यात येऊन पाण्याचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा. अशी मागणी वाळुज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी (ता.3) रोजी करण्यात आली. 
सिडको वाळुज महानगर येथील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा कमी होत असल्याने वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडकोचे कार्यकारी आभियंता कपिल राजपुत तसेच पाणीपुरवठा सहाय्यक आभियंता यांची बुधवारी (ता.3) रोजी भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत येथील पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाच्या मागणीनुसार या परिसरात 2021 पूर्वी जी लोकसंख्या होती. त्यात अनेक पटीने वाढ झाली. पूर्वीच्या लोकसंख्येनुसार येथे 5 एम एल डी पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र लोकसंख्या वाढल्याने 10 एमएलडी पाणीपुरवठा करायला पाहिजे. परंतु पूर्वीच्याच लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी सिडको वाळूज महानगर येथे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत येथील पाणीपुरवठा वाढवण्यात यावा. तसेच दैनंदिन पाणी पुरवठ्यात सुधारणा व सुसूत्रता आणण्यात येऊन पाण्याचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा. अशी मागणी वाळुज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या बैठकीस समितीचे अध्यक्ष तथा तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुट्टे, उपाध्यक्ष नरेंद्रसिंग यादव, ज्ञानेश्वर म्हस्के, पी एस गुजर, आश्विनी बनसोडे हे उपस्थित होते.
