
वाळूज महानगर, (ता.4) – वाळुज महानगरातील रामलीला मैदान बजाजनगर येथे 22 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या अभिनय स्वरूप संगीतमय रामलीला नाट्याचा शुक्रवारी 3 ऑक्टोंबर रोजी श्रीराम राज्याभिषेकाने समारोप करण्यात आला. श्रीराम जानकी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी नवरात्र ते दसऱ्याच्या शुभ पर्वावर रामलीला भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

या अकरा दिवसीय रामलीला कार्यक्रमात श्रीराम जन्म, मुनि आगमन, महर्षि विश्वामित्र आणि राजा दशरथ संवाद, सुकुमार श्रीराम, लक्ष्मण द्वारा राक्षस ताड़काचा वध, महर्षि विश्वामित्र व श्रीराम लक्ष्मण यांचे जनकपुरीकडे प्रस्थान, गौतम ऋषिची शापित पत्नी अहिल्याचा उद्धार, राजा जनक यांच्या जनकपुरी येथे आयोजित सीता स्वयंवर, श्रीराम परशुराम संवाद, श्रीराम सीता विवाह, राजा दशरथ व राणी कैकई संवाद, राजा दशरथ यांचे निधन, श्रीराम वनगमन, शूर्पणखा कान, नाक कापणे, रावणद्वारा सीता हरण, श्री हनुमान सुग्रीव, शबरी, वानर सेना भेट, कुंभकर्ण व मेघनाद वध, लक्ष्मण शक्ती, लंका दहन, श्रीराम रावण महायुद्ध, रावण वध व दहन आदी रामायणातील प्रसंग कलाकारांनी हुबेहूब सादर केले. शुक्रवारी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्यासह वानर सेनेचे अयोध्या आगमन त्यानंतर श्रीराम राज्याभिषेकाने रामलीलाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी गोस्वामी तुलसीदास रचित रामायण व प्रभू श्रीरामाची आरती पुजारी राजेश्वरानंद पांडे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सत्य सनातन धर्म प्रचारक रामायण रामलीला मंडल काशी (उत्तर प्रदेश) निवासी पंडित हरिश्चंद्र उपाध्याय यांच्या नेतृत्वात 30 कलाकार व वाद्यवृंदानी सादर केलेल्या रामलीला कार्यक्रमाने वाळूज महानगर वासियांची मने जिंकली. रामलीला यशस्वितेसाठी श्रीराम जानकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर के सिंह, उपाध्यक्ष ज्योति स्वरूप मित्तल, राघवेंद्र सिंह, महासचिव उदय प्रतापसिंह तोमर, नरेंद्रसिंह यादव, प्रवीणसिंह राठोड, नरपत सिंह, मुकेशचंद्र शर्मा, राघव प्रसाद वर्मा, धरमवीर सिंह, राजेश सिंह, रामबली प्रजापती, तेजप्रताप सिंह, अमित सिंह, मिथलेश पांडे, आदित्य त्रिपाठी, रामबाबू राऊत, शैलेन्द्र सिंह तोमर, बच्चा सिंह, कैलाश यादव, पुजारी राजेश्वरानंद पांडे, पुजारी अशोक पांडे, कृष्णा चौबे, जगत बहादुर सिंह, कान्हा सिंह यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
