
वाळूज महानगर, (ता.12) – आपल्या उपजीविकेसाठी व्यवसाय, नोकरी, शेती हे काहीही दणकून सनकून करा. परंतु ते करत असताना आपले जीवन सुजलाम, सुफलाम होण्यासाठी या परिपूर्ण राधाकृष्ण भगवंताची उपासना करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रबोधनात्मक प्रतिपादन श्री क्षेत्र सावखेडा येथील गुरुवर्य महंत कैलास गिरी महाराज यांनी वाळूज येथे रविवारी 10 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी केले.
शिवाजीनगर, वाळूज येथील सुरेश केरे आणि परिवाराच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर उभारले आहे. या मंदिरात राधा कृष्णमूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी 16 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र सावखेडा येथील गुरुवर्य महंत कैलास गिरी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाला. यावेळी कैलास गिरी महाराज यांनी 
‘उभारीला हात|
जागी जाणवली मात||
देव बैसले सिंहासनी|
आल्या याचका होय धनी||
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर किर्तन करत श्री भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे महात्मे विशद केले.
प्रथम भगवान श्री कृष्ण आणि राधेच्या मूर्तीची
शिवाजीनगर परिसरातून टाळ, मृदंगाच्या जयघोशात मिरवणूक काढण्यात आली. 
त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक यजमान सुरेश केरे, पोपट केरे (मामा), पप्पू केरे यांनी होमहवन, यज्ञ करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गुरुवर्य महंत कैलास गिरी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सद्गुरु गंगागिरी महाराज भजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये झालेल्या 
या कार्यक्रमास हभप राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद गंगापूर तालुकाध्यक्ष शरद महाराज बनसोडे, हभप संतोष महाराज गोरे, मृदंगाचार्य हरिभाऊ महाराज, हभप सरगर महाराज, हभप भरत महाराज जाधव, हभप कांबळे महाराज, हभप चक्के महाराज, हभप माने महाराज, कृष्णा महाराज जोशी, डॉ. न्यानेश्वर निळ, योगेश दळवी, बाबासाहेब शिंदे, शिवराई आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भगवान पाटील, सुदाम खजिनदार, तात्यासाहेब देवढे पाटील आदींसह शिवाजीनगर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवानराव पांढरे, रवींद्र पवार, सेक्रेटरी साळुंखे, भानुदास कापडे, सोपान गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
