
वाळूजमहानगर, (ता.27) :- तुर्काबाद, येसगाव, तांदूळवाडी रस्त्याचे काम बोगस होत असल्याने शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दर्जदार काम करण्यात यावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे धाव घेत निवेदन दिले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद पश्चिम अंतर्गत तुर्काबाद, राजुरा, येसगाव मार्गे घोडेगाव, तांदुळवाडी या 19 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट होत आहे. शिवाय पाण्याचा ओघ लक्षात घेता राजुरा व येसगाव या दोन ठिकाणी मोठ्या पुलांची आवश्यकता असतानाही केवळ नळकांडी पुल करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी कमी जास्त रुंदीचा हा रस्ता करण्यात येत आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे. यासाठी परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांनी राजुरा, येसगाव रस्त्यावर उतरून संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात रविवारी (ता.19) निषेध आंदोलन केले. तसेच पालकमंत्री संदिपान भुमरे यांना निवेदन देऊन या कामाची चौकशी करण्यात यावी व कामाचा दर्जा सुधारण्यात यावा. अशी मागणी केली आहे.
यावेळी माजी सरपंच भराड पाटील, येसगावकर, घोडेगावचे शिकंदर पहिलवान, राजूराचे उपसरपंच लक्ष्मण सावंत, येसगावचे ग्रामपंचायत सदस्य गोरख दिवटे, गणेश बोबडे, साहेबराव बोबडे, भानुदास जाधव, योगेश जाधव, आबासाहेब जिवरक, दत्ता चानगुडे, बाळासाहेब शेळके, नामदेव पवार, अंकुश पाटेकर, शेषराव पाटेकर, गणेश दिवटे, साईनाथ जाधव आदींची उपस्थिती होती.
