
वाळुज महानगर, (ता.26) – ग्रामपंचायत विभक्तीकरणासह अनेक महत्वपूर्ण विषयाच्या ठरावासाठी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने रामराई येथे सोमवारी (ता.26) रोजी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे अनेक विषयांना बगल देण्यात येऊन ग्रामसभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप आहे.

जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जोगेश्वरीसह रामराई, कमळापूर, नायगाव- बकवाननगर व रामराईवाडी या पाच गावांचा समावेश आहे. भौगोलिक दृष्ट्या ही ग्रामपंचायत मोठी असल्याने या ग्रामपंचायतच्या विभक्तीकरण प्रस्ताव समोर येत आहे. त्यामुळे जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने सोमवारी (ता.26) रोजी रामराई येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील पटांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
असे होते ग्रामसभेचे विषय –
1) मागील सभेचे इतिवृत्त वाचुन ग्रामसभेची मान्यता घेणेबाबत. 2) ग्रामपंचायत विभक्तीकरण्याचा परिपुर्ण प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा करणे. 3) विविध योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करणे. 4) अनाधिकृत देशी दारूचे दुकाने बंद करणे बाबत. 5) ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी अंतर्गत विविध विभागाची माहिती सभेपुढे देणे. 6) विकास कामाचा आढावा सादर करणे. 7) स्वस्तधान्य दुकानातील धान्याबाबत. 8) वार्षिक प्रशासकीय अहवाल सादर करणे. 9) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने बाबत आढावा सादर करणे, 10) आयत्यावेळी अध्यक्षांचे परवानगीने येणारे विषय.
https://youtu.be/-73c1OieZTc?si=HVeOHRNDegfPzUs5
सकाळी 11 वाजेच्या सुमारास सरपंच योगिता आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली. प्रथम काही विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत विभक्तीकरण्याचा विषय समोर आला. यावेळी मोठा गोंधळ झाला. या गोंधळातच अनेक महत्त्वपूर्ण विषयांना बगल देत ग्रामसभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे आणखी गोंधळ झाला. हा गोंधळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की, अक्षरशा एकमेकाची गचंडी धरून खाली पाडण्या इतपत प्रकार शिगेला गेला. यावेळी खुर्च्या फेकण्यासाठी प्रयत्न झाला. तसेच एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. परिणामी रामराई येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
अनेक प्रश्न अनुत्तरीय –
दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विभक्तीकरणाबाबतच्या प्रस्तावाला म्हणजेच बाजूने आणि विरोधात किती मते मिळाली. याबाबतची माहिती मिळू शकली नाही. तसेच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली किंवा नाही. हे प्रश्न सुद्धा अनुत्तरी आहेत.
