
वाळूजमहानगर, (ता.3) – आयोध्येतील रामंदिर केवळ मंदिर नसून राष्ट्रमंदिर आहे. ते एक आध्यात्मिक व सामाजिक ऐक्याचे प्रतिक बनणार असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयाम सहप्रमुख राजीव जहागिरदार यांनी वाळुज परिसरातील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत बोलताना केले. 
बजाजनगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात वाळूज परिसरातील विविध मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, राममंदिराच्या रक्षणासाठी 1 लाख 71 हजार हिंदूनी आपले रक्त सांडले. कीतीतरी महिने हा संघर्ष चालूच होता. अखेर 23 मार्च 1528ला मीर बाकीने आयोध्येतील राममंदिर अर्धवट पाडून बाबरी ढाचा उभा केला. यानंतरही 76 लढाया झाल्या. यात 4 लाख हिंदूचे बलिदान झाले. 500 वर्षाच्या संघर्षानंतर 1984 ला विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून श्रीराम जानकी रथ यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, गंगामाता भारतमाता यात्रा तसेच श्रीराम शिलापूजन यात्रा काढल्या. 1990 ला कारसेवा ठरली. या कारसेवेत मुलायमसिंगने दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. यात अनेक कारसेवक धारातीर्थी पडले. देशभर संतापाची लाट उसळली. आणि काही दिवसातच मुलायमसिंगचे सरकार कोसळले विहिंपने पुनश्च एकदा 1992 ला कारसेवेसाठी चलो आयोध्या हा नारा दिला, यावेळीही 6 डिसेंबर 1992 ला लाखो कारसेवक आयोध्येत पोहचले. व संतप्त कारसेवकांनी बाबरी ढाचा उध्वस्त केला. पुढील न्यायालयीन लढाईत 9 नोव्हेंबर 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण 67 एकर जागा रामललाचीच असल्याचा निर्णय दिला. व मंदिर बांधण्यास परवानगी दिली. भारत सरकारने लगेचच रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाने मंदिर बांधकामासाठी निधी संकलनाचे अभियान केले. यात अडीच हजार कोटी निधी जमा झाला. 5 ऑगस्ट 2020 मध्ये तत्कालीन सरसंघचालक आणि पंतप्रधान यांच्या हस्ते भूमीपूजन होऊन बांधकामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले असून 22 जानेवारी 2024 ला बालरुपातील प्रभूराम भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. हा सोहळा सर्व हिंदूनी जवळच्या मंदिरात सकाळी 11 ते 2 या वेळेत स्क्रीनवर दाखवण्याचे बैठकीत उपस्थित आसलेल्या मंदिर विश्वस्तांनी मान्य केले असून आपण सर्वानी मंदिरात एकत्र येवून 108 वेळा रामनाम जप करावा, हनुमान चालीसा पठण करावे, अन्य भजन कीर्तन करावे व ज्यावेळी आयोध्येत आरती असेल त्यावेळी मंदिरात आरती करुन प्रसाद घेवून घरी जावे. सायंकाळी सर्वानी घरासमोर पाच दिवे लावावेत. असे आवाहन तिर्थक्षेत्र न्यासाने केले आहे. अशी माहीती विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयाम सहप्रमुख राजीव जहागिरदार यांनी दिली. या बैठकीस विहिंपचे योगेश पाठक, रा.स्व.संघाचे अनिल पाटील, कैलास चव्हाण, डॉ.माके, आदिक पाटील, सुदामराव भन्डे, विजय उखळे, तात्या वानखेडे, संतोष चौधरी, संजीव तायडे, रामकृष्ण चव्हाण, रंगनाथ बोरसे, तुषार ढवळे, दामोधर घुगे, तानाजी सरडे, गोरख शेळके, रमेश खोसे, भरत जायभाये, विष्णू सिरसाठ यांच्यासह मोठ्या प्रमाणात मंदिर समितीचे विश्वस्त उपस्थित होते.
