वाळूजमहानगर, (ता.19र) – मठ, मंदिर, संस्थान यांची सनातन हिंदू धर्माला अत्यंत गरज आहे. मंदिर हे तुमच्या आमच्या धर्माचे प्रतीक आहे, ताकद आहे. हिंदू धर्माची शक्ती आहे. घराची कळा अंगण सांगते, आणि गावाची कळा मंदिर सांगत असतं. म्हणून प्रत्येक गावात चांगलं मंदिर असावं. तुमची आमची मूलबाळ, नातू नाती मंदिरात आले पाहिजे. कारण संस्कार संपन्न संतती ही जगातली मोठी संपत्ती आहे. असे मार्गदर्शनपर प्रतिपादन हभप राष्ट्रीय धर्माचार्य डॉ. जनार्दन मेटे महाराज यांनी वाळुज येथे केले.
ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त वाळूज येथील कलानगरात त्रिदीनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच्या मंगळवारी (ता.18) रोजी कीर्तनात हभप राष्ट्रीय धर्माचार्य डॉ. जनार्दन मेटे महाराज यांनी संस्कार संपन्न पिढीसाठी मंदिराचे महत्व पटवून सांगितले. यावेळी मेटे महाराज यांनी
आरंभी आवडी आदरें आलें नाम ।
तेणें सकळ सिध्दि जगीं जालें पूर्ण काम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा ।
तूं माय माउली जिवीं जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामें सकळ संदेहो फ़िटला ।
बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥
या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर अखंड हरिनाम कीर्तनाचे पहिले पुष्पगुंपले. रात्री 8 ते 10 वाजे दरम्यान झालेल्या या हरिकीर्तनाला
कलानगरचे निर्माते छोटू दादा कुंजर, हभप शरद महाराज बनसोडे, मधुकर घोरपडे, रमेश शेळके, ज्ञानेश्वर धनवटे, आंनदा खेडकर, बाबासाहेब तुपे, येवले महाराज, शांताराम महाराज, बटूले महाराज, सोपान महाराज चव्हाण, पांडुरंग बोरकर, अभंग महाराज पठाडे यांच्यासह कलानगर, शिवशक्ती नगर, समता कॉलनी आदी नागरी वसाहतीसह शिवाजीनगर येथील गजानन महाराज भक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
