
वाळूजमहानगर, (ता.16) – बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष प. पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने व गुरूपुत्र आदरणीय नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय एकदिवसीय मुल्यसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास हिवाळी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांसह भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आजचे लहान मुले व युवा हे उद्याच्या देशाचे भवितव्य आहेत. म्हणून त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार होऊन योग्य वयात योग्य निर्णय क्षमतेची जडणघडण होणे आवश्यक आहे. प. पू. गुरुमाऊली नेहमी म्हणतात की, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. लहान मनावर सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता जागृत करण्यासाठी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन वर्गाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परिणामी तरूण वयात अनावधानाने होणाऱ्या चुका पासून येणारी पिढी स्वतःचे व सोबतच देशाचे हित साधू शकेल. वृध्दाश्रम मुक्त भारत करण्याच्या चळवळीला या मुल्यसंस्कार वर्गातून खतपाणी देऊन येणारी पिढी आई वडील आणि वृध्दांचा मान सन्मान करणारी बनते. यासाठीच अशा हिवाळी शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.
सकाळ सत्रात गुरुपुत्र आदरणीय नितिनभाऊ विद्यार्थ्यांशी आँनलाईन पध्दतीने संवाद साधला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व्यायाम, खेळ, विज्ञानसोबतच अध्यात्माची ही गरज असल्याचे प. पू.गुरूपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे यांनी सांगितले आहे. या शिबिराचे आयोजन श्री स्वामी समर्थ केंद्र बजाजनगर यांनी केले सकाळी 8.30 वाजता या शिबिराची सुरवात दीप प्रज्वलना ने झाली व सायंकाळी 8 वाजता समारोप झाला.
