वाळूजमहानगर, (ता.01) – शेतकऱ्यांवर कधी कोणते संकट येईल याचा काहीही भरोसा नाही. वेगवेगळ्या अनेकदा येणाऱ्या या संकटामुळे अनेक शेतकरी आर्थिक डबघाईस आलेले आहेत. अशाच एका आर्थिक संकटाला पाच शेतकऱ्यांना सामोरे जावे लागल्याची घटना रविवारी (ता.1) रोजी घडली आहे. या घटनेत लग्नाच्या वरातीत फटाके वाजवल्याने ते शेजारच्या ऊसात पडले. आणि लाखो रुपयाचा ऊस जळून खाक झाला. असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, लिंबे जळगाव शिवारातील शेत गट क्रमांक 33 मधील शेतकरी चंद्रशेखर त्रिंबक आलोने यांच्या 1 हेक्टर 76 आर, सुरेश त्रिंबक आलोने 1 हेक्टर 76 आर, अवंतिका त्रिंबक आलोने यांच्या 1 हेक्टर 57, दत्तात्रय हरिभाऊ आलोने 1 हेक्टर 60 आर व गट क्रमांक 17 मधील सुलेमान मोहम्मद खान यांच्या 1 हेक्टर 21 आर जमिनीतील जवळजवळ दहा एकर क्षेत्रात ऊस लावलेला होता. यातील अधिकांश ऊस तुटून कारखान्याला गेला होता. तर काही ऊस बेणे म्हणून लावण्यासाठी तसाच उभा होता.
हे सर्व शेतकरी लिंबे जळगाव येथील राहणारे आहेत. त्यांच्या शेताजवळच गुरु सृष्टी लाँन नावाचे मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयात रविवारी (ता.1) रोजी लग्नाचा कार्यक्रम होता. वरात लग्न मंडपात येतात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यातील काही फटाके उडून ऊसात पडले आणि ही आग लागली. असा आरोप शेत मालक तथा शेतकरी चंद्रशेखर आलोने यांनी केला आहे.
दरम्यान ऊसाला आग लागल्याची माहिती मिळाल्याने शेत मालकासह परिसरातील शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वाळूज पोलिसांना माहिती देऊन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तसेच धामोरी सज्जाचे तलाठी विजय गिरबोणे व सामाजिक कार्यकर्ते सईद बाबा पठाण यांनी या आगीचा पंचनामा केला. यात पूर्ण वाढलेला उभा ऊस व ठिबकचे पाईप. असे अंदाजे 6 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.
दोन बंबांनी विझवली आग –
ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच महानगर पालिका औरंगाबाद व वाळूज एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. तोपर्यंत बराचसा ऊस जळून खाक झाला होता.
ही आग विझवण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेचे उप अग्निशमन अधिकारी डी डी साळुंखे, महेंद्र खोतकर, परमेश्वर साळुंखे, वाहन चालक सुभाष दुधे तसेच वाळूज अग्निशामन दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले. या आगीची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
