
बजाजनगर, (ता.31) – वाळुज महानगरातील बजाजनगर येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे आगमन गुरुवार 29 मे रोजी झाले होते. यानिमित्त आयोजित चरण पादुका दर्शन सोहळ्यात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
बजाजनगर येथील त्रिमूर्ती चौकाजवळच्या वसंत माने यांच्या निवासस्थानी गेल्या 24 वर्षांपासून श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन होत असते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील गुरुवर्य अनंत पोतदार काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी परिक्रमा दरवर्षी आयोजित केल्या जाते. श्री स्वामी भक्तांना चरण पादुकांचे दर्शन त्यांच्या गावात घडो हा या पालखी परिक्रमा मागील उद्देश आहे. बजाजनगर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून स्वेद शिल्प हाउसिंग सोसायटी आर एक्स 16 येथील माने यांच्या निवासस्थानापर्यंत पालखीची टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
यानंतर डॉ. सुमित माने व डॉ.हर्षदा माने – कोल्हे यांच्या हस्ते श्री स्वामींच्या चरण पादुकांचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. यानंतर महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. पूजेचे पौरोहित्य संजय कुलकर्णी (अक्कलकोट) यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी वसंत माने, सुरेखा माने, माधुरी पाटील, रीना तळप, तेजस्विनी माने, उमा वळसनकर, अलका व दिलीप दौड, अलका व कैलास गवांदे, अतुल राणे, विनोद डावकर, भारत कबाडे, सुदाम भंडे, सुनील पवार, वसंत शिंदे ,अंकुश गवांदे, दत्ता व ज्योती गारोळे, अश्विन इनकले, अशोक आगळे, संजय फलटणे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वामी भक्तांनी परिश्रम घेतले.
