
वाळुज महानगर, (ता.2) – प्रतिष्ठानच्या बोअरचे पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाल्याने आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तीन जणांना वेद मारहाण केली. ही घटना 31 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. गेल्या काही दिवसापासून बजाजनगरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ताराचंद यमाजी खोसे (वय 45) हे कुटुंबासह आर एक्स 6/10, कमलपुष्ष हौसिंग सोसायटी, अयोध्यानगर, बजाजनगर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. तेथेच असलेल्या अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानचे सचिव म्हणून खोसे हे काम पाहतात. प्रतिष्ठानच्या मोकळ्या जागेत पाण्यासाठी बोअर घेतलेला असून ते पाणी झाडांना व पिण्यासाठी वापरतात. या बोअरचे पाणी भरण्याचे कारणावरुन सोसायटीतील निळकंठ भाऊसाहेब शिंदे, सुनिता निळकंठ, पूजा निळकंठ व ताराचंद खोसे यांच्यात 30 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद झाला होता. सोसायटीतील विषय असल्याने तो आपसात मिटला होता.
त्यानंतर 31 मार्च रोजी सांयकाळी 6.30 वाजेच्या सुमारास भास्कर नानासाहेब आरगडे, वय 39 वर्षे, रा. वाळूज, विजय रमेश आरगडे, वय 21 वर्षे, रा. वाळुज, नितीन लहू पेरे, वय 29 वर्षे, रा. पाटोदा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर, सुनिल दादाराव काळे, वय 24 वर्षे, रा. पाटोदा, कृष्णा जगन्नाथ धनवटे, वय 21 वर्षे, रा. तुर्काबाद (खराडी), ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर हे कमलपुष्ष हौसिंग सोसायटीत आले. आणि तू माझ्या बहिणीला व भाऊजीला मारहाण का केली असे विचारत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन ताराचंद यमाजी खोसे (वय 45) यांना व त्यांची पत्नी सविता व मुलगा आदेश यांना शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी ताराचंद खोसे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 143, 147, 149, 323, 504 506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहे.
