
वाळुज महानगर, (ता.2) – बजाजनगर येथील स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष हनुमंत भोंडवे होते.
यावेळी भोंडवे यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कार्याचा, स्वराज्याच्या मागणीचा व समाजसुधारणेतील योगदानाचा विद्यार्थिनींना परिचय करून दिला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या घोषणेच्या आठवणीने सभागृहात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संस्थेचे सचिव अशोक लगड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. ते केवळ साहित्यिक नव्हे, तर समाजप्रबोधन करणारे लढवय्ये होते. त्यांनी पारंपरिक लोककथा, पोवाडे, गाणी आणि कथांद्वारे दलित, श्रमिक आणि शोषित घटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. सामाजिक न्याय, समता व मानवी हक्क यांचा आग्रह त्यांच्या लेखणीतून सातत्याने व्यक्त झाले” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सोनटक्के यांनी, तर आभार संजय साठे यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपाध्यक्ष राजेंद्र माने, संचालक पंडित नवले, विजय उखळे, महेश भोंडवे, स्वप्निल नवले, स्वप्निल उखळे व शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री कदम यांच्यासह समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
