
वाळूजमहानगर, (ता.4) – भारत आणि जपान यांच्यामध्ये सांस्कृतिक नाते असून परस्पर सहकार्याने दोन्ही देशाची प्रगती साधली जाईल. त्यामुळे जापनीज भाषा शिकणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मराठवाडा ऑटो क्लस्टरचे कक्ष प्रमुख सुदर्शन धारूरकर यांनी केले.

वाळूज येथील दीक्षा जापनीज वर्गाच्या वर्षपूर्ती समारोहात धारूरकर हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक दीपक त्रिभुवन हे होते. भारताकडे मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, तर जपानकडे प्रगत तंत्रज्ञान. भारत हा सर्वाधिक युवा असणारा देश आहे, तर जपान हा वृद्धांचा देश म्हणून ओळखला जातो. दोन्ही देशांच्या गरजा या परस्पर पूरक असल्याने दोन्ही देशांनी एकत्र येत जगावर अधिराज्य गाजवता येईल. आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत लेखणी पासून ते वाहन उत्पादनापर्यंत जपानी तंत्रज्ञान अग्रेसर आहे. जपानला वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक उद्योग, नर्सिंग, होम केअरटेकर. अशा विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी दोन्ही सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये जपान येथे मोफत प्रशिक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे. जपानमध्ये नोकरी व्यवसाय करण्यासाठी जपानी भाषा येणे अनिवार्य आहे. वाळूज महानगर सारख्या भागात दीपक त्रिभुवन यांनी भविष्याची गरज ओळखून दिशा जापनीज क्लासेसच्या माध्यमातून जपानी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केलेले आहेत. या अभिनव उपक्रमांचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे. याप्रसंगी फुलाबाई दत्तू त्रिभुवन, उषा त्रिभुवन, सविता साळुंखे, सुरेखा काकडे, दीक्षा त्रिभुवन, स्वाती धारूरकर तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
