
वाळूजमहानगर, (ता.17) – छोटा हत्ती वाहन लांबविणा-या चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलीसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले. चोरी झालेल्या वाहनात जीपीएस प्रणाली असल्यामुळे पाठलाग केल्याने ही चोरी उघडकिस आली.
अंकुश अशोकराव आघाव (45, रा.जोगेश्वरी) यांनी त्यांचा छोटा हत्ती वाहन (एम.एच.20, डी.ई.-0919) सोमवारी वाळुज औद्योगिक वसाहतीतील स्टारवेज या कंपनीसमोर उभा केला होता. तो अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केला. मंगळवारी (ता.16) रोजी सकाळी अंकुश आघाव हे स्टारवेज कंपनीसमोर केले असता त्यांना आपला छोटा हत्ती गायब असल्याचे दिसले. यानंतर आघाव यांनी एमआयडीसी परिसरात शोध घेतला. मात्र वाहन मिळून न आल्याने आघाव यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी वाहनमालक आघाव यांची विचारपुस केली असता चोरी झालेल्या वाहनात जीपीएस सिस्टीम असल्याचे समजले. त्यावरून तात्काळ शोध लावण्यासाठी पोलीस पथकास रवाना केले.
जीपीएस प्रणालीमुळे चोरटा जेरबंद-
चोरी झालेल्या वाहनात जीपीएस प्रणाली बसविली असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या वाहनाचा शोध सुरु केला. त्यावरून चोरी झालेले वाहन मालेगावच्या दिशेने जात असल्याचे जीपीएस लोकेशनवरुन लक्षात आल्याने उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, पोहेकॉ. विनोद नितनवरे, पोकॉ.यशवंत गोबाडे यांच्या पथकाने पाठलाग केला. मालेगाव पासून 35 किलोमिटर अंतरावर वाखरी गावाजवळ एमआयडीसी वाळूज पोलीसांनी पाठलाग करुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी दत्तात्रय मधुकर लोणारे (38, रा.लोणारवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक) यास ताब्यात घेतले.
रेकी करून करायचा चोरी –
दत्तात्र्य लोणारे हा वाळूज परिसरात रेकी करुन वाहनमालकांना घेरुन त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम मागण्याचा बहाणा करायचा. दरम्यान अंकुश आघाव यांचा छोटा हत्ती याच पद्धतीने चोरून घेऊन चालला होता. मात्र पोलीसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलस आयुक्त महेन्द्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक प्रविण पाथरकर, पोहेकॉ. विनोद नितनवरे, धीरज काबलिये, पोकॉ. सुरेश कचे, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, नितीन इनामे, गणेश सगरे, हनुमान ठोके, समाधान पाटील, रवी गायकवाड, बाबासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे आदींनी केली.
