
वाळुज महानगर, (ता.20) – छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका स्कुटीने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. ही खळबळजनक घटना गोलवाडी जवळ घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चैतन्य शरद ढवळे (रा. साऊथ सिटी, वाळूज महानगर) हा कामानिमित्त स्कुटी (एमएच 20, एफएच -9419) ने छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना अचानक स्कुटीतून धूर येऊ लागल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत त्याने स्कुटी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर काही क्षणांतच स्कुटीने पेट घेतला. या आगीत संपूर्ण स्कुटी जळून खाक झाली.

या घटनेमुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून, वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नियमित तपासणी करावी. अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
