
वाळूज महानगर, (ता.1)- वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाइन कंपनीला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या सहा कामगारांच्या मृत्यूस जवाब जबाबदार ठरल्याप्रकरणी कंपनीचा मालक व ठेकेदार अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कंपनी मालकाने नियमाची पायमल्ली करून अतिरिक्त बांधकाम केले. तसेच कंपनीत राहण्याची परवानगी नसताना सुद्धा तेथे राहण्याची व्यवस्था केली. तसेच कंपनीच्या ठेकेदाराने जास्त पैशाच्या मोहापाई कामगारांना कंपनीत राहण्यास भाग पाडले. त्यामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंपनी मालक साबेरखान शब्बीरखान पठाण, रा. बायजीपूरा, गल्ली नं. 10, छञपती संभाजीनगर व ठेकेदार मोहम्मद हिसनोमुद्दीन शेख, रा. डलौखर, तालुका मिर्झापूर जिल्हा मधुबनी, बिहार राज्य या दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अकबर अलीने सांगितली आपबिती – या आगीतून बालंबाल बचावलेल्या व झाडावर चढून उड्या मारणाऱ्या कामगाराने या आगीबाबत आपबीती सांगितली की, दिवसभर काम केल्यानंतर सर्व कामगार नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होतो. यावेळी तेथे ठेकेदारासह पंधरा कामगार, ठेकेदाराची पत्नी व दोन लहान मुले असे होतो. रात्री उशिरा कंपनी मालकाचा भाऊ आला आणि तो सुद्धा तेथेच होता. खाली कंपनी आणि वर राहण्यासाठी रूम होती. ही आग लागली तेव्हा आम्ही वरच्या रूममध्ये होतो. कंपनीला आग लागली त्यामुळे सर्वत्र दूर झाला. 
आगीच्या ज्वाला उसळू लागल्या. बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता. तेथे कच्चा व तयार झालेला माल होता. तो आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यामुळे आम्हाला बाहेर निघता आले नाही. जीव वाचवण्यासाठी आम्ही चार ते पाच जण गच्चीवर चढलो. शेजारीच झाड होते. या झाडावर चढून आम्ही खाली उड्या मारल्या. त्यामुळे आम्ही या आगीतून बालंबाल बचावलो. मात्र एक कुत्रा व सहा कामगार यांना बाहेर न येता आल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अशी भयावह घटना मी पहिल्यांदाच पाहिली आणि अनुभवली. काम करणारे सर्वजण 18 ते 35 वयोगटातील व दोन जण वृद्ध आहेत.

नियमाची पायमल्ली करून बांधकाम –
वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मध्ये असलेली ही कंपनी एक बाजू वगळता सर्व बाजूने बंदिस्त आहे. नियमानुसार कंपनीचे कंट्रक्शन झाल्यानंतर उर्वरित जागेत कंपनी मालकाने अतिक्रमण करून कंपनीच्या सर्व बाजूंनी पत्र्याचे शेड उभारले होते. कंपनीतील कामगार व स्थावर संपत्तीच्या सुरक्षिततेची कोणती खबरदारी न घेता अग्निशमन दलाच्या नियमाची पायमल्ली करून हात मोजे तयार करण्याचे काम सुरू होते. शिवाय आग रोधक यंत्र वगैरे काहीच नसल्याने आग भडकली. 
तर वाचले असते कामगारांचे प्राण –
या कंपनीमध्ये प्लास्टिक व कॉटन अशा दोन प्रकारचे हातमोजे तयार करण्यात येत होते. त्यासाठी कच्चामाल व तयार झालेला माल कंपनीतच होता. त्याला आग लागल्यामुळे कंपनीत येण्या जाण्यासाठी एकच मार्ग आहे. कंपनीत कामगारांना राहण्याची परवानगी नसतानाही तेथे कामगारांना राहण्याची व्यवस्था केली होती. जर अग्निशमन दलाच्या नियमाची पायमल्ली केली नसती. आणि बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग असता तर या आगीतून कामगारांचे प्राण वाचले असते.
