
वाळूजमहानगर, (ता.1) – वाहतुकीचे नियम हे वसुलीसाठी नव्हे तर वाहन चालकासह प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठीच आहे. पोलीस विनाकारण कोणालाही त्रास देत नाही. आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, आपली घरी कोणीतरी वाट बघतय. हे लक्षात घेऊन वाहन चालवताना आवश्यक ती कागदपत्रे जवळ असली पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात मंगळवारी (ता.30) रोजी केले.
के टी संगम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड, लिंबे जळगाव टोल नाका वाळुज, व सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2024 अंतर्गत वाहनधारकांसाठी नेत्र तपासणी शिबिर व मार्गदर्शन मंगळवारी (ता.30) रोजी करण्यात येऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्टिकर चिटकवण्यात आले. याप्रसंगी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 65 वाहनचालकांची तपासणी करण्यात येऊन 13 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे बोलत होते. कार्यक्रमास के टी संगम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड लिंबे जळगाव टोल प्लाजाचे व्यवस्थापक संजय सिंह, वाळुज पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुडे, डॉ. महादेव संकपाळ, वाळूज वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गिरी, पोलीस हवालदार कृष्णा इधाटे, अशोक थोरात, विकास कांबळे, अजीज परसुवाले, किशोर सोमासे, नारायण तुपे लिंबेजळगावचे सरपंच नवनाथ वैद्य, उपसरपंच हशम पटेल, माजीउपसरपंच समीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य इरफान पटेल, रुपचंद गाडेकर, सैय्यद अली, सिफ्ट, ईनचार्ज प्रशांत मुगटकर, दौलतराज जाधव, सैय्यद सिकंदर, मतीन शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
