वाळुज महानगर, (ता.2) – अतिक्रमण तर काढणारच आहेत, मात्र नागरिकांचे नुकसान होऊ नये. म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम दोन दिवस पुढे ढकलण्यात येत आहे. या दोन दिवसात नागरिकांनी आपापले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे. नसता सोमवारी 4 ऑगस्ट पासून अतिक्रमण काढण्यात येईल. यामध्ये आडवा येणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील. असा इशारा अतिक्रमण धारक, पोलीस व एमआयडीसी प्रशासनाच्या उपस्थितीत वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आला.
या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी, उप अभियंता गणेश मुळीकर, क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह अतिक्रमण धारकांची उपस्थिती होती.
प्रारंभी बैठकीमध्ये अतिक्रमणधारक नागरिकांनी प्रशासना संदर्भात मार्किंग मध्ये तफावत होत असल्याचे मुद्दे मांडले. याचबरोबर धार्मिक स्थळावर अतिक्रमण काढण्याचे मान्य करत. उपजिवीकेचे काही ठराविक अतिक्रमण प्रशासनाने न काढण्याची मागणी केली.
यावेळी उद्योजक कैलास भोकरे, पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कौस्तुभ भटणकर, अधिक पाटील, भारतीय ग्रामीण पुनर्रचनसह संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बी बी जाधव, माजी सैनिक सुरेश फासगे, आम्रपाली बौद्ध विहारचे अध्यक्ष रामदास बर्फे आदींनी अतिक्रमणाबाबत काही प्रश्न उपस्थित केले.
यावेळी अतिक्रमणधारकांचे सर्व म्हणणे ऐकून घेत पोलीस उपायुक्त संजय सानप यांनी एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारी अतिक्रमण मोहीम ही शासकीय नियमानुसार होत असल्याचे सांगत कोणीही या मोहिमेला अडथळा निर्माण करू नये. तसेच व्यवसाय व दुकानावर कारवाई सुरू ठेवून नागरिकांनी कुठल्याही भ्रमात राहू नये.
तसेच रहिवासी भागांचे अतिक्रमण 15 ऑगस्टनंतर काढले जाणार असून अतिक्रमण हटवण्यासाठी अजून दोन दिवस वेळ देणार असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाचे काम फक्त सुरक्षा पुरविण्याचे असून आमची भूमिका नागरिकांची नुकसान करण्याची नसल्याचे ते यावेळी म्हणाले. यामुळे दोन दिवसात अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांनी मार्किंग करताना शहानिशा करूनच केल्याचे सांगत नागरिकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याची आवाहन केले.
कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी यांनी अतिक्रमणाला नियम लागत नाही. एमआयडीसी प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून नागरिकांमध्ये अतिक्रमानाविषयी ध्वनी क्षेपणाद्वारे जनजागृती केली आहे.
मात्र धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढणार नसून धार्मिक स्थळाचे आडून होत असलेले व्यवसाय, दुकाने यावर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बैठकीला भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पोपटराव अधिक, काकासाहेब चेळेकर, पोपट हांडे, अरविंद धीवर, विशाल खंडागळे, भागिनाथ गायकवाड, के व्ही गायकवाड, विष्णू खेडकर आदींसह पंढरपूर, बजाजनगर
येथील अतिक्रमणधारक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
