
वाळूजमहानगर, (ता.) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाईन एंटरप्रायजेस या कंपनीतील अग्नी तांडवात मृत्युमुखी पडलेल्या 6 पैकी 5 कामगाराचे शव 2 रुग्णवाहिकेने नातेवाईकांसह बिहारकडे रवाना करण्यात आले.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मध्ये असलेल्या
सनशाईन एंटरप्रायजेस (प्लॉट -216) या हातमोजेचे तयार करण्यात येत होते. या कंपनीत एका ठेकेदारासह तेथे काम करणारे 15 कामगार, ठेकेदाराची पत्नी व 2 लहान मुले कंपनीतच राहत होते. या कंपनीला रविवारी (ता.31) रोजी 12.30 सुमारास भीषण आग लागल्याने काही कामगार बाहेर पळाले. मात्र बाहेर येण्याचा मार्ग बंद झाल्याने 1 कुत्रा व 6 कामगार कंपनीमध्येच अडकले. त्यांना बाहेर पडण्यास दुसरा कोणताही मार्ग नसल्याने त्यांचा होरपळून मृत्यु झाला होता. या अग्नी तांडवाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 6 कामगारांपैकी जालना जिल्ह्यातील रियाज बशीर सय्यद (25) याच्या मृतदेहावर रविवारी रात्री मुळगावी रोषणगाव, ता. बदनापूर, जि.जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र उर्वरीत मोहम्मद मुस्ताक मोहम्मद ईब्राहिम (62), कौशर आलम जफरुद्दीन (37), मोहम्मद इक्बाल मोहम्मद एहरार (17), रामलाल रामविलास सिंदरीया (46), मोहम्मद मार्गब आलम सहाबुद्दीन (32) हे कामगार बिहार राज्यातील असल्याने तसेच त्यांच्या कुटुंबियाची अर्थिक परिस्थती बिकट असल्यामुळे इतक्या दूर त्यांचे मृतदेह कसे न्यावे, या विवंचनेत त्यांचे नातेवाईक पडले होते. त्यामुळे शेवटी पोलीस व समाजातील दानशुर व्यक्तीच्या मदतीने हे शव नेण्यासाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्याने सोमवारी (ता.1) रोजी सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांचे मृतदेह बिहारकडे रवाना केले.

कंपनी मालकाने झटकले हात –
विशेष म्हणजे ज्या कंपनीत ही दुर्घटना घडली. ज्या कंपनी मालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडली. ज्या कामगारांच्या जीवावर पैसे कमावले. त्याच कामगाराचे मृतदेह बिहार येथील मुळगावी नेण्यासाठी अर्थिक मदत करण्यास कंपनीमालक साबेर पठाण याने नकार दिल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली होती.
