
वाळुज महानगर, (ता.21) – पिण्याचे पाणी, ड्रेनेजलाईन, रस्त्याची दुरवस्था, नादुरुस्त पथदिवे अशा अनेक समस्या निर्माण झाल्याने विशेष म्हणजे या समस्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे सिडको वाळुज महानगरमधील त्रस्त नागरिकांनी वॉर्ड दक्षता समितीच्या वतीने निवेदन पाठवून सोमवारी 22 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सिडको वाळूज महानगर येथील वॉर्ड दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको प्रशासक, जिल्हाधिकारी व पोलिसांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिडको वाळुज महानगर परिसरातील नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे पाण्याचा ज्वलंत प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत नवीन बांधकाम परवाने व प्लॉट विक्री तात्काळ थांबवण्यात यावी, अतिवृष्टीमुळे सारा व्यंकटेश, सिल्वर पार्क, सारा आकृती व इतर सोसायट्यांमध्ये सांडपाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे होऊन सुद्धा अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भोंडवे पाटील स्कूल दरम्यानचे रस्ते खड्रडेमय झाले असून त्याची दुरुस्ती करावी, तसेच विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदले. ते रस्ते पुर्ववत करावे, परिसरात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मानवी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा निर्मूलनासाठी कायमस्वरूपी प्रभावीपणे उपाययोजना राबवावी. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईन चोकअप असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी. याचबरोबर आवश्यक भागात नव्याने पथदिवे उभारून नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करावे. अशा विविध मागण्यांसाठी तसेच सिडकोच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी सिडको वॉर्ड दक्षता समितीच्या वतीने शिवस्मारक-जिजाऊ उद्यान येथे सोमवारी 22 डिसेंबरपासून साखळी उपोषण पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे सुरेश फुलारे, राजाराम पाटील, रविंद्र वाणी, प्रथमेश वटमवार, पुरुषोतम सोनवणे, राहुल महाजन, सोमनाथ करंगे, राजेंद्र रोडगे, बाळासाहेब गाडे, सुरेश जगताप, बाबासाहेब हांडे, रतन नलावडे, श्रीधर मोरे, शिवाजी कल्याणकर, सुरेश कनसे, संतोष राठी, धनाजी सुर्यवंशी, हरिश्चंद्र तावडे, राजाभाऊ काळे, दिपक राऊत, लक्ष्मीकांत उनवणे, गजानन वानखेडे, प्रदिप पाटील, जितेंद्र पाटील, सागर डगळे, वैजीनाथ कोल्हेकर, बद्रीनाथ जगधणे आदींनी सांगितले.
