वाळूज महानगर, (ता.7)- महाराष्ट्राची भूमी संतामुळे पावन झालेली आहे. ज्या मातीमध्ये दया, नीती, धर्म याचे पालन केल्या जाते. ती माती म्हणजे महाराष्ट्राची आहे. कलानगरच्या या जागेत श्री गजानन महाराजांचे मंदिर होत आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून येथे भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहे. अडगळीत पडलेली ही जागा, हा परिसर आता पवित्र व सुंदर होत आहे. ही कृपा म्हणजे संत महात्म्यांची आहे असे प्रतिपादन ह भ प सोमनाथ महाराज राऊत यांनी केले.
वाळूज येथील शिवाजीनगर परिसरातील कलानगर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी दुसऱ्या दिवसाचे शनिवारी (ता.2) रोजी ह भ प सोमनाथ महाराज राऊत यांनी
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥
उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥ ३ ॥
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं यापरता ॥४॥
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तन केले. या प्रसंगी कलानगर, शिवशक्ती कॉलनी, समता कॉलनी, दत्त कॉलनी, श्रद्धा कॉलनी, या शिवाजीनगर परिसरासह वाळूज, रामराई, शिवराई, पिंपरखेडा व पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज मंदिर समिती पदाधिकारी परिश्रम घेतले.
