
वाळूजमहानगर, (ता.13) – तलाठ्यांनी सादर केलेल्या जुन्या याद्या कायमस्वरूपी करुन शेतक-यांना अनुदानाची रक्कम तात्काळ खात्यावर टाकण्यात यावी. नसता सर्व शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही तहसीलदार गंगापूर यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गंगापुर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकरी हे अनुदानापासून वंचित आहे. त्यांना पुढील हंगामात शेतीच्या मशागतीसाठी व पेरणी करण्यासाठी अनुदानाची अत्यंत गरज आहे. ती तात्काळ अदा करण्यात यावी. ही जबाबदारी असतांनाही जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांमार्फत सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना पुन्हा नव्याने सूचना दिल्या की, पुन्हा शेतक-यांचे पासबुक, आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर घेवुन तलाठी यांना नविन इंग्रजी मध्ये अनुदानासाठी याद्या तयार करून दोन दिवसात सादर करा. तरचं नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा करण्यात येईल. हा अंत्यत चुकीचा निर्णय असून त्यामुळे असंख्य शेतक-यांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे.
पुर्वी तलाठी यांनी स्थळपाहणी, पंचनामे करून तहसील कार्यालयात अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतक-यांच्या याद्या, बँक पासबुक व मोबाईल नंबर लिंक असलेल्या आधारकार्ड झेरॉक्ससह सादर केलेल्या आहेत. त्यातील काही गावातील शेतक-यांना नुकसान भरपाई अनुदान मिळाले देखील. त्यामुळे तलाठी यांनी सादर केलेल्या जुन्या याद्या कायमस्वरूपी करुन तात्काळ शेतक-यांना अनुदानाची रक्कम खात्यावर टाकण्यात यावी. नसता सर्व शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर संतोष माने, डॉ. ज्ञानेश्वर निळ, वाल्मिकी शिरसाठ, संजय गायकवाड, समाधान गायकवाड, भाऊसाहेब गवळी, गणेश चव्हाण, अहमद पटेल, अशोक धाने, अनंता कुमावत आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.
