
मोलमजुरी व कंपनीत काबाडकष्ट करून घर बांधण्यासाठी विटा आणण्यास एक एक रुपया असे 20 हजार रुपये जमा केले. मात्र अचानक आग लागून घरातील अन्नधान्य, पैश्याअडक्यासह घरसंसार जळून खाक झाला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही ही. घटना शनिवारी (ता.29) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घाणेगाव येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, नायगाव ता. चिखली जि. बुलढाणा येथील निरंजन खंदारे हे पत्नी अर्चना, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह घाणेगाव येथील एकलव्यनगर, वार्ड क्रमांक तीन मध्ये पत्राच्या एका खोलीत राहतात. पक्के घर बांधण्यासाठी ते स्वतः मजुरी तर पत्नी कंपनीत कामाला जाते. मात्र घर बांधण्यापूर्वीच आग लागून मोठे नुकसान झाले. शनिवारी (ता.29) रोजी सकाळी नेहमीप्रमाणे अर्चना खंदारे या कंपनीत कामाला गेल्या होत्या. तर निरंजन खंदारे हे गावी गेलेले आहे. त्यांची दहा वर्षाची मुलगी दोन वर्षीय छोट्या भावाला घेऊन समोरच्या घरी सांभाळत होती. त्यामुळे खंदारे यांचे घर बंद होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून घरातून धूर निघू लागला. ही माहिती कळताच घाणेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संजय जोंधळे, सुरेश गायकवाड, नवनाथ मोरे, नामदेव गायके, बाबाराव नरवडे यांनी धाव घेत मिळेल ते पाणी आणून आग विझवली. मात्र तोपर्यंत या दुर्घटनेत घरातील फ्रिज, एलईडी टीव्ही, अन्नधान्य, सोन्याची पोत, बाळ्या, टॉप्स, रोख रक्कम व कपडे असा ऐवज जळून खाक झाला. आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र गॅस लीक झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
