
वाळूजमहानगर, (ता.15) – वाळूज येथील गावठाण व गावठाण बाहेरील गायरानातील रहिवासी क्षेत्रावरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यात यावी. या मागणीचे निवेदन वाळूज ग्रामपंचायत तर्फे जिल्हाधिकारी व आमदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे व आमदार प्रशांत बंब तसेच भाजप जेष्ठ नेते किशोर धनायत यांना ग्रामपंचायत च्या वतीने दिलेल्या एका निवेदनात असे नमूद आहे की, वाळूज गावात असलेल्या गावठाण क्षेत्रात गोरगरिबांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी घरे बांधली आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार ही गावठाण व गायरान क्षेत्रातील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार वाळूज येथील गायरान गट नंबर 340 व गट नंबर 341, खळवाडी गट नंबर 380 तसेच वाळूज खुर्द मधील लाईननगर येथील रहिवाशी क्षेत्रातील अतिक्रमणे कायमस्वरूपी करून ते अतिक्रमणधारकांच्या नावावर करण्यात यावी. यावेळी उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, नदीम झुंबरवाला, पोपट बनकर, अमजदखाँ पठाण व राहुल भालेराव यांचे उपस्थिती होती.
