
वाळूज महानगर (ता.3) – गंगापूर उपजिल्हा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अतुल रासकर, सोलेगाव येथील दत्तात्रय जोशी व अमोल शिंदे यांनी कोविड काळात केलेल्या सर्वोत्तम कार्यासाठी ‘अप्रतिम मीडिया फाउंडेशन’तर्फे पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद झाली. मुंबई येथे गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या परिषदेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, ‘अप्रतिम मिडिया’चे संचालक डाॅ. अनिल फळे, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. मनोभावे केलेल्या जनसेवेत अधिक प्रगल्भता यावी यासाठी हा सन्मान करण्यात येत असल्याचे डाॅ. फळे यांनी सांगितले. कोविड काळात अमोल शिंदे, पत्रकार दत्तात्रय जोशी आणि अतुल रासकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिक आणि रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे कार्य केल्याने यांचा हा सन्मान करण्यात आला. आम्हाला मिळालेला सन्मान गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डाॅक्टर्स, कर्मचारी, रुग्ण कल्याण समितीतील सहकारी जेष्ठ पत्रकार विजय बनसोड, सुमित मुंदडा, प्रशांत मुळे, पत्रकार दत्तात्रय जोशी, अमोल शिंदे या सर्वांचा असल्याचे अतुल रासकर यांनी सांगितले.
