
वाळूजमहानगर, (ता.2) – मराठा आरक्षणासाठी वाटेल ते करण्याचा चंग बांधलेल्या सकल मराठा समाजाने गावबंदीचा नारा देत गावोगावी फलक लावून राजकीय पुढार्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. ती आज प्रत्यक्षात गंगापुरात 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्षात अंमलात आणली. यावरून असे दिसून येते की, सकल मराठा समाज जे बोलतो, ते करूनच दाखवतो. याचा प्रत्यय आला आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाला सकल मराठा समाजाने भरभरून पाठिंबा दिला. त्यातूनच गाव बंदीचा नारा पुढे आला आणि तो अंमलातही येत आहे.
गंगापूर शहरात 2 डिसेंबरपासून मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (ता.2) रोजी गंगापूर शहरात येणार होते. राजकीय नेते येऊन दोन समाजात तेढ निर्माण करतात. या संमेलनाला मराठा समाजाचा विरोध नाही. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढार्यांनी गंगापूर शहरात प्रवेश करू नये. असा इशारा मराठा समन्वयक भाऊसाहेब शेळके पाटील यांनी दिला होता. आरक्षणासाठी पेटून उठलेल्या मराठा समाज बांधवांचा रोष पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला दौरा रद्द केला.
